Sunday, October 4, 2009

चीन @ 60


चीन. भारताचा शेजारी देश.चीन जगातली सध्याची एक महासत्ता.. क्रीडा,लष्कर,व्यापार आणि आणखी ब-याच काही क्षेत्रात जगात अव्वल स्थान मिळवायचेच.या महत्वकांक्षेने झपाटलेला देश .भारताशी सीमाप्रश्नावर उभा दावा मांडणारा देश. पंचशील कराराचे उल्लंघन करत 1962 मध्ये आपले लचके तोडणारा देश. जगातल्या सर्व भारतविरोधी शक्तींना उदारहस्ते मदत करणारा शेजारी..आणि बरेच काही

1 ऑक्टोबर 2009 या दिवशी चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीला 60 वर्षे झालीत. माओंच्या नेतृत्वाखाली चिनी शेतक-यांनी साम्यवादी क्रांती केली. मागच्या साठ वर्षात यांगेत्से नदीच्या पात्रातून 'लाल' पाणी वाहून गेलंय. वर्गसंघर्षाविरुद्ध लढे उभारणा-या चीनमध्ये गेल्या साठ वर्षात राज्यकर्त्यांनी वेगवेगळी प्रयोग केलेत.केंद्रीय सत्ता आणि साम्यवादी राजवट मजबूत करणे हाच या सर्व प्रयोगांमधील मुख्य उद्देश होता. विसाव्या शतकात चीनमध्ये झाली इतकी सांस्कृतिक आणि भौतिक पातळीवरची घुसळण क्वचितच कोणत्या देशात झाली असेल.

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत श्रीमंत म्हणून राहण्यापेक्षा समाजवादी अर्थरचनेत गरीब राहणे कधीही चांगले’, अशी माओच्या सांस्कृतिक क्रांतीची हाक होती. माओंच्या या हाकेपासून थेट मांजर काळे असो वा गोरे, जे उंदीराची शिकार करते ते मांजर चांगले.’ असा डेंग झिओपिंग पर्यंतचा बाजरपेठीय दृष्टीकोन असा थक्क करणारा प्रवास चीनने गेल्या साठ वर्षात केला आहे.

माओने 1949 मध्ये चीनची सत्ता साम्यवादी क्रांतीने ताब्यात घेतली.परंतु माओचे साम्यवादी मॉडेल हे रशियन मॉडेलपेक्षा वेगळे होते.चीनी शेतकरी हा या मॉडेलचा मूळ गाभा होता.तर रशियन राज्यक्रांतीमध्ये मजुरांना सर्वात जास्त महत्व होते. माओंची प्रयोगशाळा होती अख्या चीन देश. सामुदायीक शेती, उद्योगांची नवी रचना यासारखे अचाट आणि अजस्त्र प्रयोग त्याने याकाळात केले.या प्रयोगाच्या जोरावर साम्यवादी पक्षात एक प्रबळ जमात तयार झाली होती.सत्तेचे टॉनिक घेऊन सशक्त बनलेला हा वर्ग आपल्याला भारी पडेल अशी भिती माओंना सतत सतावत होती.

साम्यवादी राजवटीच्या आशिर्वादाने बलवान होत चाललेल्या या भांडलवादी जमातीला त्यांनी मुळापासून उखाडायचे ठरवले.सांस्कृतिक क्रांतीची हाक त्यांनी कोट्यावधी जनतेला दिली.आपल्याच पक्षातल्या तळागळातल्या कार्यकर्त्यांना केंद्रीय नेत्यांवर हल्ला करण्यास चिथावले.त्याकाळातील चिनी समाजात घडत असलेल्या हिंसाचाराची वर्णने करणारी पुस्तके वाचली तर कुणीही बधीर होऊन जाईल. चंगेझ खानपासून ते हिटलर पर्यंत जगातल्या सर्व हुकूमशाहांना लाजवेल असे अभूतपूर्व शिरकाण याकाळात चीनमध्ये झाले. तेही सरकारी आशिर्वादाने.

माओंच्या नंतर चीनमध्ये डेंग झिओपिंग यांची राजवट आली.या राजवटीत माओंच्या उद्दीष्टांपासून पूर्णपणे फारकत घेण्यात आली.बदलत्या परिस्थितीशी दूळवून घेतले नाही तर ह्या महाकाय देशाचे तुक़डे होतील हे बहुधा डेंग यांनी ओळखले असावे.त्यामुळेच 1979 नंतर त्यांनी उदारीकरणाचे नवे युग चीनमध्ये आणले. गोर्बोचेव्ह यांनी सोव्हिएत युनियनमध्ये ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोइका’- स्वातंत्र्य आणि आर्थिक पुनर्रचनेचे नारे दिले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.कोंडून पडलेला रशियन समाज या वा-याने इतका मुळासकट हलला की या देशाची अनेक शकले झाली.डेंग यांनी गोर्बोचेव्हच्या आधीच हे बदल सुरु केले होते.मात्र टप्प्याटप्याने.केंद्रीय नेतृत्वाची पकड सैल होऊ न देता.

वर्गसंघर्षाविरुद्ध एकेकाळी नारे देणा-या चीनमध्ये आता ' आहे रे ' गटाचा एक मोठा वर्ग तयार झाला आहे.स्पेशल इकॉनॉमिक झोन, आक्रमक बाजार, गगनचुंबी इमारती, पंचतारांकित झगमगाट , अजस्त्र असे खाजगी प्रकल्प याच्या जोरावर एक नवा साम्यवादी राजवटीतला अस्सल भांडवलशाही चीन आज तयार झालाय.एवढ्या टोकाचा अंतर्गत विरोध घेऊन आत्मविश्वासाने वाटचाल करणारा चीन हा अधुनिक युगातील एक चमत्कार मानला पाहिजे.

चीनला झोपेतच राहू द्या. तो उठला, तर सारे जग हादरवून सोडेल’ ह्या नेपोलियनच्या प्रसिद्ध वाक्याची या देशाने गेल्या काही वर्षात जगाला वारंवार आठवण करुन दिली आहे.सोव्हियट युनीयनच्या पतनानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचे हे काम या देशाने केले आहे. अगदी क्रिडा क्षेत्रावरही चीनने आपली हुकमत आता सिद्ध केलीय.आज रिपब्लिक ऑफ चायना म्हणून जो देश ओळखला जातो, त्या देशाने सुरुवातीचा बराच काळ ऑलिंपिककडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही.

१९४९नंतर प्रथम म्हणजे १९८४च्या लॉस एंजलिस ऑलिंपिकमध्ये चिनी अ‍ॅथलीट्स प्रथम उतरले. त्या स्पर्धेत चीनने थेट चौथा क्रमांक पटकावला. त्यानंतर जवळपास प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत चीनने आपला ठसा उमटवला आहे. 2008मध्ये झालेल्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये चीनने 51 सुवर्णपदके घेऊन पहिला क्रमांक पटकावला. .तर या वर्षी सारा भारत वर्ष अभिनव बिंद्राला मिळालेल्या पहिल्या वाहिल्या वैयक्तिक सुवर्णपदकांच्या आनंदामध्ये मग्न झाला होता.

चीनची लष्करी ताकदही महाकाय आहे.जगातील सर्वात मोठे पायदळ चीनकडे आहे.चीनकडे 23 लाख खडे सैन्य आहे. भारताची सर्व महत्वाची शहरे चीनी क्षेपणअस्त्रांच्या टप्प्यात येतात.चीनचे वायूदळही तितकेच प्रभावशाली आहे. भारतानेही नुकतीच चीनच्या तुलनेत आपले हवाईदलाचे सामर्थ्य एक तृतियांशही नसल्याची नुकतीच कबुली दिली आहे. 1964 सालीच अण्वस्त्रधारी बनलेल्या या राष्ट्राकडे आज सुमारे 400 अणवस्त्र असल्याची शक्यता आहे.इराण, उत्तर कोरियाप्रमाणेच पाकिस्तान या आपल्या कट्टर शत्रूला अणवस्त्रधारी बनवण्यात चीनची सक्रीय मदत लाभलेली आहे.

भारताचा शेजारी देश असल्याने चीनमध्ये घडणा-या प्रत्येक घटनांचे थेट आपल्यावर परिणाम होऊ शकतो.चीनबाबतीत गाफील राहीलो तर काय होऊ शकते याचा अनुभव आपण 1962 मध्ये घेतला आहे.पाकिस्तान,म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ मालदिव आणि श्रीलंका अशा भारताच्या बाजूच्या सर्व देशात चीनने आपले जाळे विणले आहे. तिबेटच्या दुर्गम भागात अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या लोहमार्गाचा उद्देश जलद गतीने लष्करी हलचाली करता याव्यात हाच आहे. भारताच्या सीमाभागात चीनने वाढवलेल्या हलचालींनी वेळीच सावध होण्याची गरज आपल्याला आहे.

गेल्या साठ वर्षात चीनने जगात आपला दरारा निर्माण केलाय.परंतु अनेक समस्यांनी चीनला ग्रासलंय.. तिबेट आणि सिंकिंयाग हे चीनचे दोन अवघड दुखणे,हे दुखनं कधी उसळी मारेल याचा नेम नाही. दारिद्रय आणि भूकबळीने गेल्या साठ वर्षात लाखो लोकांना जीव गमावावा लागला आहे. आर्थिक सुधारणांचे वारे अंगात गेलेल्या तरुण वर्गाला 1989 मध्ये चिनी राज्यकरत्यांनी रणगड्यांखाली चिरडले. या उठावाला आता वीस वर्षे झालीत.परंतु भविष्यातही असा उठाव होऊ शकतो ही भिती चीनी राज्यकर्त्यांना सतत पोखरत असते.त्यामुळे कोणतेही लहाण मोठे उठाव पाशवीपणे चीनमध्ये दडपले जातात.बेकारी आणि विषमता चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलीय. एकेदिवशी या सा-याचा विस्फोट होऊन चीनी महासत्तेचा मुखवटा गळून पडेल असा अंदाज अनेकांनी वर्तवलाय.

ऐक शेजारी देश म्हणून चीनमध्ये होणा-या प्रत्येक गोष्टीकडे सावध नजर भारताला ठेवायला हवी.इतिहास, अर्थकारण, व्यापार, राजकारण व हजारो मैलांची सीमा या गोष्टींनी दोन देशांचे ऋणानुबंध अतूट आहेत. चिनी अर्थव्यवस्था कोसळली किंवा कम्युनिस्ट राजवट कोसळून तेथे राजकीय गोंधळ उडाला, तर त्याचे परिणाम युरोप-अमेरिकेपेक्षा भारताला अधिक भोगावे लागतील. चीनच्या हिरक महोत्सावाने दबून अथवा हुरळून न जाता डोळसपणे त्याचा सामना करण्याचे धोरणच भावी काळात भारताला उपयोगी पडणार आहे.

3 comments:

Niranjan Welankar said...

आपला लेख म्हणजे अत्यंत दर्जेदार ! क्रिकेटमधला लॉ ऑफ ऍवरेज आपल्याला अप्लाय होत नाही. विस्तृत माहिती आणि अत्यंत संतुलित विश्लेषण ! मात्र युरोपातील देशांनी 20 व्या शतकात जास्त चढ उतार पाहिले आहेत असं मला वाटतं.
शुभेच्छा.

Shrijeet said...

hi,onkar its been pleasure to post my comments on one of my afficinados i.e china.
as u have written it in short and sweet manner i would like to congradulate u for it.

todays china is unique potpourie of maos foreign policy dengs economic policy and sun tzus war strategy. china realy trying to use every resource at its disposal to run india and every other power down.now u have already taken a halicopter view of chinese past and presence i would like to suggest some measures to reduce chinese menace.

1) india should negotiate with china not only on its disputed area but to dimarcation of actual possesed area.chinese are incurging in our land for last several years so to halt it somewhere we have to demarcate mutually possesed area that can be done with the help of settelites illumination of border areas,setting up of cammeras wherever possibe

2- setting up of joint arbitration


3-jont mechnism to monotor border areas etc

china is definitly compelling us to take some wrong step but the message for india is wait and watch and keep the powder dry

santosh gore said...

चीनची प्रगती बघून आपण नेमके काय करावे आणि काय करू नये, याचा बोध घेता येतो. मात्र असे जगभरातलील अनेक बोध आपल्या देशाने पचवले आहेत. त्यामुळे कोणत्याही पॅटर्नची पूर्ण कार्यवाही केल्याशिवाय विकास होणार नाही.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...