Tuesday, November 10, 2020

कमनशिबी!


 

ते वर्ष होते 1988. टीम होती मुंबईतील प्रसिद्ध शारादाश्रम शाळा. स्पर्धा होती मुंबईच्या शालेय क्रिकेटमधील मानाची समजली जाणारी हॅरिस शिल्ड. शारदाश्रम शाळेचा पहिला खेळाडू बाद झाला. त्यानंतर एका 13 वर्षांच्या मुलाने पॅड बांधले. दुसरा खेळाडू बाद झाला. तो 13 वर्षाचा मुलगा हातात ग्लोज घालून सज्ज झाला. आता एक जरी विकेट पडली तर त्याला मैदानात खेळायला जायचे होते. तो 13 वर्षाचा मुलगा हातात बॅट घेऊन मैदानात येण्यासाठी सज्ज होता. त्याने तब्बल दोन दिवस प्रतीक्षा केली. विकेट काही पडलीच नाही. अन्य दोघांनी शालेय क्रिकेटमध्ये 664 रन्सची विक्रमी पार्टनरशिप केली.

या पार्टरनरशिप केलेल्या जोडीतील एक फलंदाज होता सचिन तेंडुलकर. सचिनची पुढच्या वर्षीच भारतीय टीममध्ये निवड झाली. तो क्रिकेटमधला सर्वात महान फलंदाज बनला. दुसरा फलंदाज होता विनोद कांबळी. कांबळीनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. हातात बॅट घेऊन दोन दिवस प्रतिक्षा करणाऱ्या तिसऱ्या खेळाडूचं नाव होतं अमोल मुझुमदार. अमोलने त्या मॅचमध्ये दोन दिवस प्रतिक्षा केली. त्याला मैदान गाजवण्याची संधीच मिळाली नाही. त्यानंतरच्या पुढच्या आयुष्यातही अमोलच्या वाटेला फक्त प्रतिक्षाच आली. राष्ट्रीय संघात त्याला शेवटपर्यंत संधी मिळालीच नाही.

सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आम्रे अशी भारतीय फलंदाजांची फळी घडवणाऱ्या रमाकांत आचरेकरांचाच अमोल शिष्य. अमोलने 1993 साली प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुंबईकडून पदार्पण करताना हरयाणाविरुद्ध 260 रन्सची ऐतिहासिक खेळी केली. पहिल्याच प्रथमश्रेणी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा 70 वर्षांहून जुना रेकॉर्ड अमोलने मोडला.

देशांतर्गत स्पर्धेत धावांची रास रचणाऱ्या अमोलची राष्ट्रीय टीममधील जागेसाठी कर्नाटकच्या राहुल द्रविडशी स्पर्धा होती. अमोल आणि राहुल दोघेही तंत्रात अव्वल. इंग्लंडचा अ संघ 1995 साली भारत दौऱ्यावर आला. त्यावेळी भारताच्या अ संघात अमोल आणि राहुल हे दोघेही होते. या संपूर्ण स्पर्धेत अमोल फेल गेला. राहुल द्रविडने उत्तम खेळ केला. निवड समितीला प्रभावित करण्याची अमोलची मोठी संधी हुकली.

त्यानंतर पुढच्या वर्षी 1996 साली दुलिप करंडक स्पर्धेत अमोलला पुन्हा एकदा संधी होती. भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार होती. त्या टीममध्ये फलंदाजांच्या दोन जागा शिल्लक होत्या. या दोन जागांसाठी राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सौरव गांगुली आणि अमोल मुझुमदार अशी चार फलंदांजांमध्ये स्पर्धा होती. त्यामध्ये राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीने बाजी मारली. इंग्लंड दौऱ्यातील ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटीत द्रविड - गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतचा पुढचा सर्व इतिहास आहे. लक्ष्मणलाही राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 साली झालेल्या ऐतिहासिक कोलकाता टेस्टनंतर लक्ष्मणही भारतीय टेस्ट टीमचा अविभाज्य घटक बनला. अमोलची प्रतीक्षा संपलीच नाही.

चुकीच्या काळात क्रिकेट खेळल्याचा फटकाही अमोलला बसला. अमोल हा मधल्या फळीतील फलंदाज. अमोल भरात होता तेंव्हा राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण असे दिग्गज फलंदाज भारतीय टीममध्ये होते. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने सरस कामगिरी करुनही अमोल कायम वेटिंग मोडवरच राहिला.

अमोलच्या मुंबई टीममधील वासिम जाफर, निलेश कुलकर्णी, साईराज बहुतुले, रमेश पोवार, कुरुविला या सहकाऱ्यांना राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळाली. जाफर हा सलामीचा फलंदाज होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अमोलसारखाच सातत्याने खेळ केल्यानंतर जाफरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. तर अन्य खेळाडू हे गोलंदाज असल्याने त्यांना संधी मिळाली.

अमोल तब्बल 20 वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आसाम आणि आंध्र प्रदेश या टीमकडूनही तो खेळला. तिथेही त्याने आपले काम चोख केले. रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो वासिम जाफरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये 9 हजारांपेक्षा जास्त धावा काढूनही अमोलला शेवटपर्यंत राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळालीच नाही.

भारतीय क्रिकेटमधल्या 'सुपर फोर' ची कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर असताना अमोलचेही वय वाढले. त्यामुळे निवड समितीने साहजिकच तरुण खेळाडूंना टीममध्ये संधी मिळाली. अखेर अमोलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळताच निवृत्ती स्विकारली.

आता निवृत्तीनंतर अमोल विविध क्रीडा वाहिन्यांवर उत्तम समालोचन करतो. तो राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय टीमचा हंगामी फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही त्याने काम केलं. त्याची निवृत्तीनंतरची कारकीर्द उत्तम सुरु आहे. असं असलं तरी त्याला आजही टीव्हीवर पाहताना एका उत्तम फलंदाजाला राष्ट्रीय संघात संधी मिळाली नाही याचे मला वाईट वाटते.

अमोलचा लवकरच टीम इंडियाच्या कोचिंग टीममध्ये समावेश व्हावा अशी माझी इच्छा आहे. क्रिकेटमधल्या सर्वात कमनशिबी फलंदाजाला मिळालेला हा थोडा तरी न्याय असेल.

Wednesday, September 30, 2020

टी. नटराजन : मजुराचा मुलगा ते आयपीएल हिरो!


इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) स्पर्धेत सन रायझर्स हैदराबाद कडून खेळणाऱ्या टी. नटराजन या बॉलरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये नटराजनने एक नाही दोन नाही तर तब्बल सात यॉर्कर्स टाकले.
'टी-20 क्रिकेटमध्ये यॉर्कर टाकण्याचे महत्व आता उरले नाही' असं आशिष नेहरा कॉमेंट्री करताना सांगत होता. त्याचवेळी नटराजननं सात यॉर्कर टाकत नेहराचे लांब दात त्याच्या घशात घातले. तामिळनाडूतल्या एका छोट्याश्या गावातल्या मजुराचा मुलगा ते आयपीएलचा हिरो हा नटराजनचा आजवरचा प्रवास मोठ्या संघर्षचा आणि सर्वांना प्रेरणा देणारा आहे.

पाचवीला पुजलेला संघर्ष!

तामिळनाडूतल्या सालेम जिल्ह्यातले चिन्नापम्पट्टी हे गाव आज क्रिकेटविश्वात थंगारासू (टी) नटारजनचे गाव म्हणून ओळखले जाते. नटराजनचे वडील साडीचे दुकानात रोजंदारीवर काम करणारे मजूर तर आई एक छोटसं चहाचं दुकान चालवते. घरची प्रचंड गरीबी. दोन भाऊ आणि तीन बहिणी अशी ही पाच भावंडं. दहा वर्षापूर्वीपर्यंत नटराजन त्याच्या आईला चहाच्या दुकानात मदत करत होता. दोन वेळेस खाण्याचा संघर्ष करणाऱ्या नटराजननं वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत क्रिकेटचे स्टेडीयम पाहिलेही नव्हते. भारतामधल्या कोणत्याही गल्लीत चालणारे टेनिस बॉल क्रिकेट हेच त्याचे विश्व. 

नटराजनच्या बॉलिंगची गावच्या क्रिकेटमध्ये जोरदार चर्चा होती. टेनीस बॉल क्रिकेटमध्ये तो सातत्याने दमदार कामगिरी करत होता. त्याचवेळी नटराजनने जयप्रकाश या स्थानिक क्लब टीमच्या कॅप्टनचे लक्ष वेधून घेतलं.  मुळचे चिन्नापम्पट्टीचे जयप्रकाश चेन्नईत स्थायिक झाले होते. नटराजनच्या बॉलिंगचं पाणी जयप्रकाश यांनी सर्वप्रथम जोखलं. त्यांनीच त्याला चेन्नईत पुढील प्रशिक्षणासाठी नेले. नटराजन तामिळनाडू क्रिकेट बोर्डाच्या चतुर्थ श्रेणी लीगमध्ये बीएसएनएलच्या टीमकडून खेळू लागला. या लीगमध्ये त्याने सर्वांना प्रभावित केले. त्यामधून त्याची 'विजय क्लब' या बड्या टीममध्ये निवड झाली. नटराजनच्या क्रिकेट करियरचा हा टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर 2015 साली तो तामिळनाडूच्या टीममध्ये निवडला गेला.

रणजी टीममध्ये निवड आणि सर्वात मोठा धक्का!

कोलकाताच्या जगप्रसिद्ध इडन गार्डन मैदानात बंगालविरुद्ध त्याने रणजी पदार्पण केले. पहिल्याच मॅचमध्ये त्याची बॉलिंग ॲक्शन वादात सापडली. त्याच्या करियरला हा फार मोठा ब्रेक होता. त्यामुळे तो पुढची दीड वर्ष राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरचे क्रिकेट खेळू शकला नाही. तामिळनाडू क्रिकेट ॲकडमीचे प्रमुख आणि रवीचंद्रन अश्विनचे सुरवातीचे कोच सुनील सुब्रमण्यम यांनी नटराजनला या खडतर काळातून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत केली. सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली नटराजननं फक्त बॉलिंग ॲक्शन बदलली नाही तर यॉर्कर आणखी घोटीव केले. नटराजन दीड वर्षांनी पुन्हा तामिळनाडूच्या रणजी टीममध्ये परतला. त्या हंगामात 24 विकेट्स घेत त्याने राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं. 

सहा बॉलवर सहा यॉर्कर !!!

तामिळनाडू प्रीमियर लीग ( टीएनपीएल) या स्पर्धेला त्याच काळात सुरुवात झाली. नटराजनला डिंडीगूल ड्रॅगन्स या टीमनं करारबद्ध केलं. या स्पर्धेतल्या एका सुपर ओव्हरमध्ये अभिनव मुकुंद आणि वॉशिंग्टन सुंदर ही दिग्गज जोडी नटराजनसमोर होती. नटराजननं त्या ओव्हरमध्ये सलग सहा यॉर्कर टाकले! यॉर्करवर हुकमी प्रभुत्व असलेल्या नटराजननं आयपीएल फ्रँचायझींचं लक्ष स्वत:कडं वेधलं. 2017 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याची मुळ किंमत ही 10 लाख रुपये होती. त्यापेक्षा तब्बल तीस पट अधिक म्हणजेच तीन कोटी रुपये मोजून त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं खरेदी केलं !!! पंजाब, कोलकाता, चेन्नई, दिल्ली या आयपीएल टीममध्ये त्याला खरेदी करण्यासाठी जोरदार चुरस रंगली होती.

 ....म्हणून जर्सीवर जेपी नाव

किंग्ज इलेव्हन पंजाबनं त्यांच्या धरसोड वृत्तीनुसार नटराजनला पुढे  मुक्त केलं. त्याचा सनरायझर्सच्या टीममध्ये समावेश झाला. विसाव्या वर्षापर्यंत क्रिकेटचं अधिकृत मैदानही न पाहिलेला हा मुलगा आज भुवनेश्वर कुमार आणि रशीद खान या दोन दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून बॉलिंग करतोय. दिल्लीविरुद्ध मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हुकमी यॉर्कर टाकून स्टॉयनीसला आऊट करत टीमला स्पर्धेतल्या पहिल्या विजयाचं दार उघडून दिलं. या आयपीएलमध्ये त्याच्या जर्सीवर जेपीनट्टू हे नाव आपल्याला दिसतं. नटराजनला क्रिकेटमध्ये पहिला ब्रेक देणारे गुरु जयप्रकाश यांच्या नावातील जेपी हे आद्याक्षर आहे. या कृतीमधून नटराजन जयप्रकाश यांनी आजवर केलेल्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करतोय. एकेकाळी क्रिकेमध्ये करियरचं स्वप्न पाहणाऱ्या जयप्रकाश यांचं नाव त्यांच्या शिष्यानं आज क्रिकेटच्या जागतिक प्लॅटफॉर्मवर नेलं आहे.



गोष्ट इथेच संपत नाही....

नटराजनची गोष्ट इथेच संपत नाही. नटराजननं परिस्थितीशी झगडत यश मिळवलं. स्वत:ला क्रिकेटच्या मोठ्या लेव्हलवर सिद्ध केलं. तो स्वत: मोठा झाला पण तो तिथेच थांबला नाही. चिन्नापम्पट्टीच्या मुलांनी क्रिकेटमध्ये मोठं व्हावं यासाठी तो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करतोय. 

नटराजनच्याच गावचा जी. पेरियास्वामी हा तरुण मुलगा घरच्या गरीबीमुळे क्रिकेट सोडणार होता. नटराजन त्याच्या घरी गेला. क्रिकेटमध्ये करियर करता येतं, क्रिकेटमुळे खाण्याची भ्रांत मिटते हे त्याने पेरियास्वामीला आणि त्याच्या पालकांना समजावून सांगितले. त्याला उत्तम क्रिकेट प्रशिक्षण मिळावे यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली. पेरियास्वामीची टीएनपीएलच्या 'चेपॉक सुपर गिल्स' या टीममध्ये निवड झाली. टीएनपीएलच्या मागच्या वर्षीच्या फायनलमध्ये चेपॉकच्या टीमला 127 रन्सचे संरक्षण करायचे होते. पेरियास्वामीने 15 रन्समध्ये पाच विकेट्स घेत टीमला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. टीएनपीएलच्या एका हंगामात सर्वात जास्त 21 विकेट्स घेण्याचा विक्रमही पेरियास्वामीने मागच्या वर्षी केला आहे. आयुष्यातील खडतर परिस्थीतीमध्ये पेरियास्वामीवर विश्वास दाखवणाऱ्या त्याच्या पाठी ठाम उभा असलेला नटराजन हा या यशाचा शिल्पकार आहे.

नटराजननं आज गावात क्रिकेट कोचिंग ॲकडमी उभारलीय. त्यामध्ये शिकणाऱ्या मुलांना क्रिकेटचे साहित्य देण्यापासूनचा खर्च तो करतो. टीएनपीएल, आयपीएल किंवा अन्य क्रिकेट स्पर्धेत मिळवलेल्या पैशांची त्याने यात गुंतवणूक केलीय. विजय शंकरसह तामिळनाडूचे काही क्रिकेटपटू त्याला या कामात मदत करतायत. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस' शी काही वर्षांपूर्वी बोलताना नटराजन म्हणाला होता, 'मला या पैशांमधून बहिणींचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्या शिकल्या, त्यांची प्रगती झाली तर होणारा आनंद हा घरात एखादी फॅन्सी कार घेतल्याच्या आनंदापेक्षा मोठा असेल.'   

 सभोवतालच्या सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यशस्वी होणारी प्रत्येक व्यक्ती ही मोठी असते. स्वत:चा संघर्ष सुरु असतानाच स्वत:सोबत आपल्या सभोवतालची माणसं मोठी व्हावी यासाठी झटणारी व्यक्ती या मोठ्या लोकांमध्येही वेगळी असतात. तामिळनाडूतल्या चिन्नापम्पट्टी गावच्या 29 वर्षांच्या टी. नटराजन गोष्ट यामुळेच वेगळी आहे. आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे.  

Tuesday, September 1, 2020

सर्वज्ञ राजकारणी


राजकारणी दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार लोकांमधून पुढे आलेल्या राजकारण्यांचा असतो. वेगवेगळे जन आंदोलन, प्रत्यक्ष निवडणुका या मार्फत त्यांची राजकीय कारकीर्द घडते. त्यांचा लोकमतावर मोठा प्रभाव असतो. दुसऱ्या गटातले राजकारण्यांना दिवाणखाण्यातील राजकारणी असं म्हणता येईल. या राजकारण्यांकडे जन आंदोलानाचं प्रमुखपद नसतं. त्यांना मोठा जनाधार नसतो. तरीही ते राजकारणात यशस्वी होतात. कारण, पक्ष किंवा सरकार चालवण्यासाठी असलेले कौशल्य, वेगवेगळ्या नियमांची माहिती, विरोधी पक्षाला सोबत नेण्याची कला त्यांच्याकडे असते. त्यामुळे ते अनेकदा त्यांच्या पक्षाचे किंवा सरकारचे संकटमोचक असतात. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे दुसऱ्या गटातले राजकारणी होते.

ज्येष्ठ काँग्रेस नेते व्ही. के. कृष्ण मेनन यांच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख ते माजी राष्ट्रपती असा त्यांचा पाच दशकांचा राजकीय प्रवास होता. इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी अशा वेगवेगळ्या पंतप्रधानांसोबत त्यांनी जवळून काम केले होते.

मुखर्जी यांना आपल्या जबाबदारीची जाणीव नेहमी होती. यामुळे २०११ साली हे सरदारजी देश चालवू शकणार नाहीतअसे एका पार्टीत बोलणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराला त्यांनी तिथेच खडसावले होते. (1) माजी राष्ट्रपतींची मुलाखत घेताना त्यांना आवाज चढवून प्रश्न विचारणाऱ्या एका बड्या टेलिव्हिजन अँकरला तिथल्या तिथे झापणाऱ्या प्रणवदांचा एक व्हिडिओ चांगलाच प्रसिद्ध आहे.

 

प्रणव मुखर्जी यांच्यातले गूण हेरुन त्यांना दिल्लीमध्ये आणण्याचे श्रेय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आहे. इंदिरा गांधी यांनी १९६९ साली वयाच्या ३३ व्या वर्षी मुखर्जींना राज्यसभा खासदार केले. त्यानंतर लवकरच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. आणिबाणीच्या काळात ते इंदिराजींच्या पाठी भक्कम उभे होते. ते केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांच्याच स्वाक्षरीने डॉ. मनमोहन सिंग यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

इंदिरा गांधीच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी पंतप्रधान होतील असा अनेकांचा अंदाज होता. काँग्रेस पक्षाने त्यावेळी राजकारणात नवखे असलेले इंदिरा गांधी यांचे पूत्र राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड केली. १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांना दणदणीत बहुमत मिळाले. त्यांनी प्रणवदांकडे दुर्लक्ष केले. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही. याच मतभेदातून १९८६ साली प्रणवदांनी काँग्रेस सोडली. त्यांनी 'राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस' या नावाची स्वत:ची वेगळी चूल मांडली. त्यांचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. ते तीन वर्षात १९८९ साली काँग्रेसमध्ये परतले.

राजीव गांधी प्रमाणे सोनिया गांधी यांचाही कदाचित प्रणवदांवर संपूर्ण विश्वास नसावा. त्यामुळेच २००४ साली सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कुशल राजकारणी प्रणवदांची पंतप्रधानपदी निवड केली नाही. वास्ताविक सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्यात प्रणव मुखर्जी यांचा मोठा वाटा होता.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात प्रणवदा मंत्री झाले. अर्थ, संरक्षण, परराष्ट्र अशी वेगवेगळी महत्वाची पदं त्यांनी सांभाळली, पण PM त्यांच्या नावाचे अद्याक्षर असलेल्या पंतप्रधानपदाने त्यांना नेहमी हुलकावणी दिली. प्रणवदांनी याबाबत कधीही जाहीर नाराजी व्यक्त न करता काम केले. केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून अमेरिकेसोबतच्या अणुकरारात त्यांची महत्वाची भूमिका होती. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून ब्रिटीश टेलिकॉम कंपनी व्होडाफोनला करचुकवेगिरी प्रकरणात पूर्वलक्षी प्रभावाने २३ हजार कोटींचा कर आकारणीचा त्यांचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. यासाठी आयकर कायद्यातही सुधारणा करण्यात त्यांनी हा पुढाकार घेतला. भारतात येऊ पाहणाऱ्या परदेशी गुंतवणुकदारांनाही या निर्णयामधून अत्यंत चुकीचा संदेश गेला. भारताच्या कोणत्याही अर्थमंत्र्यांनी घेतलेला तो सर्वात चुकीचा निर्णय होता.

प्रणवदांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते. त्यामुळेच डावे पक्ष, तृणमुल काँग्रेस आणि शिवसेना अशा वेगवेगळ्या ध्रुवावर असलेल्या पक्षांनी राष्ट्रपती पदासाठी त्यांना पाठिंबा मिळाला. सर्वपक्षीय पाठिंब्यातून तयार झालेले वातावरण आणि राजकीय दबाव यामुळेच सोनिया गांधी यांनी त्यांना २०१२ साली राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली. प्रणवदा राष्ट्रपती झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या मंत्रिगटाचे प्रणवदा प्रमुख होते. प्रशासकीय निर्णय किंवा राजकीय प्रसंग अशा सर्व प्रकारात त्यांची भक्कम ढाल युपीए सरकाराच्या बचावासाठी पुढे होते. प्रणवदा राष्ट्रपती झाल्यावर युपीए सरकारचं हे संरक्षण संपले. सरकारवरील धोरण लकवाचा आरोप अधिक तीव्र झाला. पुढे २०१४ साली देशात सत्तांतर घडले.

संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये घालवलेले प्रणव मुखर्जी राष्ट्रपती आणि 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा देत सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान अशी काहीशी अवघडलेली परिस्थिती २०१४ मध्ये होती. प्रणवदांनी घटनात्मक जबाबदारीचं भान राखत ही परिस्थिती हातळली. पंतप्रधानांच्या, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अधिकारावर कधीही अतिक्रमण केले नाही. 'गुजरातमधून दिल्लीत आल्यानंतर येथील कारभाराचे वडिलकीच्या नात्याने अनेक धडे प्रणवदांनी आपल्याला दिले' अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात.

राज्यसभेत बहुमत नसल्याने मोदी सरकारने वारंवार काढलेले वटहूकूम, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा वादग्रस्त निर्णय अशा प्रत्येक प्रसंगी प्रणवदांनी सरकारच्या आदेशावर सही केली. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संघर्षाचे उदाहरणं अनेक आहेत, असाच राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात संघर्ष प्रणवदांनी कधीही होऊ दिला नाही. केंद्र सरकारचे अंतिम उत्तरदायीत्व जनतेशी असते, याची त्यांना जाणीव होती. प्रगल्भ राजकीय समज आणि व्यावहारिक ज्ञान यांच्याशी त्यांनी कधीही फारकत घेतली नाही.

प्रणवदांनी राष्ट्रपती भवनाला अधिक लोकाभिमुख केले. स्वीय सहायकाच्या मध्यस्थीशिवाय मोबाईलवर उपलब्ध असलेले ते कदाचित देशाचे एकमेव राष्ट्रपती असावे. (1) राष्ट्रपतीपदावरुन निवृत्त झाल्यानंतर लगेच CitiznMukherjee या ट्विटर हँडलच्या माध्यमातून एक सामान्य नागरिक म्हणून ते शेवटपर्यंत सर्वांच्या संपर्कात होते.

वैचारिक विरोधकांवर कायमस्वरुपी फुली न मारण्याचा सुसंस्कृतपणा प्रणवदांकडे होता. राष्ट्रपतीपदावरुन निवृत्त झाल्यानंतर नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिले. त्यांच्या या निर्णायवर काँग्रेस पक्षातून मोठी टीका झाली. अगदी प्रणवदांच्या मुलीनेही या निर्णायवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ( 3 ) प्रणवदा या सर्व दबावाला बळी न पडता रा.स्व. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. 

प्रणवदांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल २०१९ साली त्यांचा भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मागील दोन दशकात जिवंतपणी भारतरत्न पुरस्कार मिळालेले ते अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतरचे दुसरेच राजकारणी होते. प्रणवदांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षाची सेवा केली. 'भारतरत्न पुरस्कार प्रदान कार्यक्रम' या प्रणवदांच्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या प्रसंगाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेसचे सर्वात वरिष्ठ नेते अनुपस्थित होते. (4)

प्रणवदा आता काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या एकूण कारकीर्दीचे यापुढे अनेकांकडून वेगवेगळ्या पातळीवर मुल्यमापन होईल. हे मुल्यमापन करत असताना प्रीतीश नंदी यांनी १९८६ साली प्रणवदा यांचे केलेल्या वर्णनाशिवाय कुणालाही पुढे जाता येणार नाही. प्रीतीश नंदी यांनी प्रणवदांचे 'The Man Who Knew Too Much' असे वर्णन केले होते. प्रचंड माहिती असणारे 'सर्वज्ञ राजकारणी' म्हणून प्रणवदा यापुढे ओळखले जातील.

संदर्भ

  1. Pranab Mukherjee — ‘man who knew too much’ but was a Rahul Dravid-like 'wall' for Congress
  2. Pranab Mukherjee's daughter unhappy with his decision to attend RSS event
  3. Rahul, Sonia Gandhi Skip Pranab Mukherjee's Bharat Ratna Event

 

Sunday, August 16, 2020

''मैं हर इक पल का शायर हूँ''

 DHONI finishes off in style...

A magnificent strike in to the crowd...

India lift the world cup after 28 years... 

महेंद्र सिंह धोनीची  यापुढे जेंव्हा आठवण काढली जाईल त्या प्रत्येक वेळी रवी शास्त्री यांचे हे वाक्य सर्वांना आठवेल. क्रिकेट पाहत मोठे झालेल्या माझ्या पिढीसाठी आजवरची सर्वात चांगली आठवण आहे. 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये नुवान कुलसेखराचा तो बॉल धोनीनं अगदी शांत आणि सहजपणे मिडऑनवरुन मैदानाच्या बाहेर फेकला. धोनीच्या या सिक्सरसोबत टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.

 कपिल देवच्या युवा आणि उत्साही टीमनं मिळवलेलं विजेतपद आम्ही केवळ टीव्हीवर हायलाईट्समध्ये पाहिलं होतं. त्यानंतर 28 वर्ष या क्षणाची देशानं प्रतीक्षा केली. सर्व देशवासियांच्या अपेक्षा धोनीच्या टीमने पूर्ण केल्या. क्रिकेटच्या पंढरीतसुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकरच्या मुंबईत धोनीनं सिक्सर खेचत सर्व भारतीयांची स्वप्नपूर्ती केली.

 महेंद्रसिंह धोनी टीम इंडियामध्ये स्थान नक्की करत असतानाच 'बंटी आणि बबलीहा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात 'छोटे छोटे शहरोंसे खाली भोर दुपहरोंसे हम तो झोला उठाके चलेबारीश कम-कम लगती हैं नदीयां मद्धम लगती है हम समंदर के अंदर चलेअसं गाणं आहे. देशात जागतिकीकरण स्थिरावत असलेला तो काळ होता. छोट्या शहरातल्या तरुणांची मोठी पिढी महानगराकडे धाव घेत होती. छोट्या गावात त्यांनी पाहिलेली स्वप्न महानगरात म्हणजेच स्पर्धेच्या महासागरात ही पिढी पूर्ण करत होती.

सिस्टिमच्या बाहेरच्या या मंडळींनी देशात घुसळण सुरु केली होती. याच काळात रांचीमधला म्हणजेच भारतीय क्रिकेटमधल्या प्रस्थापित शहरी बेटांच्या बाहेरचा महेंद्रसिंह धोनी हा तरुण टीममध्ये दाखल झाला. 2002 मधला रेल्वेतला सामान्य टिकीट चेकर ते  स्वत:चं जेट विमान सहज घेऊ शकेल असा देशातला श्रीमंत खेळाडू हा  धोनीचा प्रवास आहे. या काळात फक्त धोनीचा बँक बॅलेन्स वाढला नाही. तर क्रिकेटविश्वातली सारी मानाची  विजेतेपद टीम इंडियाच्या कपाटात आली आहेत.

महेंद्र सिंह धोनी येण्यापूर्वी भारतीय टीममध्ये काही ठरावीक महानगरांमधील खेळाडूच प्रामुख्याने होते. धोनीनं छोट्या शहरातील खेळाडूंसाठी टीमचा दरवाजा सताड उघडला. भारतीय टीमवरील  काही ठरावीक शहरांची मक्तेदारी संपली. छोट्या शहरातील खेळाडूंना टीममध्ये स्थिरवण्यासाठी आणि सर्वोच्च पातळीवर सर्वोत्तम खेळ करण्यासाठी आवश्यक वेळ, पाठिंबा आणि मार्गदर्शन धोनीकडून मिळाले.

 प्रत्येक कॅप्टनचं एक वैशिष्ट्य असतं. कपिल देव स्वत: अग्रभागी राहून टीमला चांगलं खेळण्यासाठी प्रोहत्साहित करत असे. सौरव गांगुलीनं टीममधल्या प्रत्येकाचा खेळ उंचवण्यावर भर दिला. लढाऊ वृत्तीला मैदानातल्या कुशल डावपेचाची जोड राहुल द्रविडनं दिली. महेंद्र सिंह धोनीचं वैशिष्ट्य काय किंवा धोनीनं टीम इंडियाला काय दिलं या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्याचं असेल तर धोनीनं टीम इंडियाला जगातली यशस्वी टीम बनण्याची 'प्रोसेसदिली.

होय प्रोसेस. धोनीच्या बोलण्यात नेहमी येणारा शब्द. धोनीच्याच वेगवेगळ्या वाक्यांचा आधार घेत सांगायचं झालं तर प्रोसेस म्हणजे,  "एखाद्या कामासाठी शारीरिक आणि मानसिक रित्या पूर्णपणे तयार असणं, भूतकाळाचा किंवा भविष्य काळाचा विचार न करता ते लक्ष्य गाठण्यासाठी स्वत:ला मैदानावर झोकून देणं. निकाल काय लागेल तो फारसा महत्वाचा नाही. पण त्यासाठी तुम्ही 90 किंवा 95 टक्के नाही तर 100 टक्के मेहनत घेतली आहे का हे महत्वाचं आहे. टीमचं हे 100 टक्के कमिटमेंट म्हणजेच प्रोसेस "

 याच प्रोसेसपूर्तीचा ध्यास घेऊन धोनी खेळला. त्यामुळेच तो केवळ टीम इंडियाचा नाही तर जगातला एक यशस्वी कॅप्टन बनला. मैदानावर असताना संपूर्णपणे फोकस होऊन खेळणं आणि  खेळताना घडलेल्या घटनामिळालेलं यशापयश हे मैदानाच्या बाहेर पडल्यावर मैदानावरच सोडणं हे धोनीचं वैशिष्ट्य होते. ही 'स्विच ऑन- स्विच ऑफवृत्ती धोनीकडं आहे. त्यामुळेच तो भारतीय क्रिकेट फॅन्सचा अमर्यादीत दबाव सहजपणे सहन करु शकला.

 धोनीने टीममध्ये येण्यापूर्वी क्रिकेटचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले नव्हते.

प्रथमश्रेणी सामन्यातही  कधी कॅप्टन नसलेला हा पठ्या थेट राष्ट्रीय टीमचा कॅप्टन झाला. कॅप्टन झाल्यानंतर  क्रिकेटचं शास्त्रीय प्रशिक्षण न घेणं त्याच्या फायद्याचं ठरलं. मैदानावरच्या समस्यांची पुस्तकी उत्तरं त्यानं शोधली नाहीत. तर आपल्या ओरिजनल मेथडनं त्यानं प्रतिस्पर्धी टीमला गोंधळात टाकलं. सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला. टीमला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.

धोनी हा कॅप्टन म्हणून अनेकदा प्रतिस्पर्धी प्लेयर्सच्या एक पाऊल पुढे असे. तो अगदी ओरिजनल सुचण्याच्या बाबतीत 'भारतीय क्रिकेटचा स्टीव्ह जॉब्ज ' होता. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बॉल आऊटमध्ये भारताने मिळवलेला विजय हा धोनीच्या याच 'एक पाऊल पुढे' विचाराचा परिणाम होता. त्याने नेहमीच्या फास्ट बॉलर्सच्या नाही तर संथ बॉल टाकून स्टंप उडवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंच्या हाती बॉल दिला होता. 


बॉल आऊटमध्ये बॉलरचे टार्गेट स्टंप होते. धोनी बरोबर स्टंपच्या मागे अशा पद्धतीने बसला की बॉलरला बॉल टाकताना टार्गेट स्पष्ट दिसत होते. बॉलर हातातून बॉल सोडेपर्यंत तो त्या जागेवरुन अजिबात हलला नाही. त्याचा योग्य परिणाम झाला. सेहवाग, हरभजन आणि उथप्पा या भारताच्या तीन्ही बॉलर्सनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले. त्याच्या अगदी उलट पाकिस्तानच्या बॉलर्सची निवड आणि विकेट किपरची स्टंपमागची पोझिशन हे सर्व काही चुकले होते. त्यामुळे त्यांच्या एकाही बॉलरला बॉल आऊटमध्ये यश मिळाले नाही.

बांगलादेश विरुद्ध २०१६ च्या टी -२० वर्ल्ड कपमध्येही धोनीच्या इतरांच्या पुढे विचार करण्याच्या वृत्तीने टीम इंडियाला तारले. हार्दिक पंड्याचा बॉल स्ट्राईकवरील बॅट्समनपर्यंत पोहचेपर्यंत त्याच्या सहकाऱ्याने अर्धे क्रिज पार केले होते. धोनीनं तो बॉल शांतपणे पकडला. थ्रो करताना हातातून निसटू नये म्हणून ग्लोज काढण्याचीही खबरदारी घेतली आणि चपळाईने समोरच्या खेळाडूला रन आऊट करत बांगलादेशच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला.  

टी-20 वर्ल्ड कपचॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप या आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांची विजेतेपद जिंकणारा धोनी हा एकमेव कॅप्टन आहे. या तिन्ही विजेतेपदामध्ये धोनीची विचार करण्याची ओरिजनल मेथड उपयोगी पडली. यामुळेच त्यानं टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शेवटची ओव्हर हरभजनला नाही तर जोगिंदर शर्माला दिली. वर्ल्ड कप फायनलमध्ये विराट कोहली आऊट झाल्यानंतर फॉर्मात असलेल्या युवराजच्या ऐवजी स्वत: मैदानावर उतरला. चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंडला विजय डोळ्यासमोर असताना त्यानं इशांत शर्माच्या हातात बॉल दिला.

सहकाऱ्यांबद्दलचा विश्वासत्यांचा खेळ उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत हाच धोनीच्या यशाचा 'एक्स फॅक्टरआहे. एकदा मिळालेलं यश हे  योगायोग असू शकतं. पण त्या यशाची पुनरावृत्ती होत असेल तर त्या यशामध्ये 'एक्स फॅक्टरनिर्णायक असतो.  सभोवतल्या व्यक्तींना नियंत्रित करतोय याची कल्पनाही न देता प्रभावित करणं हा महान नेत्यांचा 'एक्स फॅक्टरअसतो. अशा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अनुयायी सहजपणे विकसित होत असतात.

धोनी कॅप्टन असताना मैदानात आणि ड्रेसिंग रुममधली शांतता, सर्वोच्च यश आणि पराकोटीचं अपयश आल्यानंतरही त्याला सारख्याच स्थितप्रज्ञतेनं सामोरं जाण्याची धोनीची वृत्ती याचा सहकाऱ्यांवर मोठा प्रभाव पडला हे नक्की. त्यामुळेच धोनीच्या टीममधले खेळाडू मैदानातल्या कठीण प्रसंगाला न डगमगता सामोरं गेले. या टीमनं खेळाचा आनंद लुटला.

संपूर्णपणे फोकस करुन खेळतानाही हा फक्त खेळ आहे. हा खेळ म्हणजे आयुष्य नाही हा धोनीमंत्र टीममध्ये कुठेतरी रुजला असावा. त्यामुळेच टी वर्ल्ड कपचॅम्पियन्स ट्रॉफीवर्ल्ड कपआशिया कपऑस्ट्रेलियातल्या तिरंगी मालिकेचं विजेतेपदआयसीसी टेस्ट रँकींगमध्ये पहिला नंबरवन-डे रँकींगमध्ये पहिला नंबरटी-20 रँकींगमध्ये पहिला नंबरहे सारं धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला मिळवता आलं.

आज टीम इंडियाच्या फिटनेसचा स्तर उंचावलाय. हा कॅप्टन धोनीच्या प्रभावाचा मोठा भाग आहे. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सीबी सीरिजपूर्वी 'संथ हलचाली करणारे खेळाडू टीममध्ये नको' असं त्यानं निवड समितीला सांगितलं होतं. एका ओव्हरमध्ये बॉलर्सना किंवा सिक्सर लगावल्यानंतर बॉलर्सवर भडकलेला धोनी कुणी पाहिला नाही. सलग चार वाईड बॉल टाकले तरी चेहऱ्यावरची रेषाही हलू न देणारा विकेटकिपर-कॅप्टन धोनी सर्वांनी पाहिलाय. पण ढिसाळ फिल्डिंगला धोनीकडं कधीही माफी नव्हती. अशावेळी धोनीनं केलेली कानउघडणी स्टम्पमधल्या मायक्रोफोनमधून साऱ्या जगानं ऐकलीय.

फिल्डिंग आणि 'रनिंग बिटविन द विकेटहा क्रिकेटमधला अत्यंत महत्वाचा घटक आहे. यामध्ये प्रत्येकानं आपलं सर्वस्व ओतलं पाहिजे हे सर्वांमध्ये बिंबणारा कॅप्टन म्हणून इतिहास धोनीला लक्षात ठेवणार आहे. धोनीचा हा वारसा विराट कोहलीने नव्या उंचीवर नेलाय. 

 'कोणताही खेळाडू हा त्याच्या नावावर नाही तर खेळाच्या जोरावर टीममध्ये असायला हवा. तो टीमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरतो की नाही हे कॅप्टनला ठरवू द्या' असा नियम धोनीनं तयार केला.याच नियमाच्या आधारावर त्यानं गांगुलीलक्ष्मण आणि द्रविड या तिघांना टीममधून वगळलं. धोनीची टेस्टमधील निवृत्ती आणि वन-डे, टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णयही त्याने असाच अगदी सहज घेतला. १०० टेस्ट खेळण्याचा किंवा २०० वन-डे मध्ये कॅप्टनसी करण्याचा विचार त्याने केला नाही. कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर, बीसीसाआयला फक्त काही ओळींचे औपचारिक पत्र पाठवून धोनीनं त्याची निवृत्ती जाहीर केली होती. 

धोनीनं वन-डे टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर मागच्या तीन वर्षात त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल वारंवार चर्चा झाली. त्याचा खेळ संथ झाला होता. त्याला मैदानात आल्यावर स्थिर होण्यास बराच वेळ लागत असे. न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही तो अगदीच संथ खेळला. त्याच्या संथ खेळामुळे झटपट रन्स बनवण्याच्या नादात हार्दिक पंड्या आऊट झाला. रवींद्र जडेजा संपूर्ण भरात होता. त्यावेळी धोनीनं फक्त प्रत्येक बॉलला एक रन काढून त्याला साथ देणे आवश्यक होते, पण तो दिवस धोनीचा नव्हता. वर्ल्ड कप फायनलमध्ये बटलर-स्टोक्स जोडीनं जवळपास याच परिस्थितीतून मॅच बरोबरीत आणली होती. पंड्या आणि जडेजाच्या मदतीनं नेहमीच्या धोनीला मॅच जिंकणे सहज शक्य होते, पण त्या दिवशी नेहमीचा धोनी दिसलाच नाही.

धोनी आणि क्रिजमध्ये अखेर अगदी काही इंचाचे अंतर राहिले. मार्टिल गप्टीलच्या थेट थ्रो ने धोनी रन-आऊट झाला. त्यावेळी मॅचचे लाईव्ह समालोचन करणाऱ्या सौरव गांगुलीसह जगभरात मॅच पाहणाऱ्या तमाम भारतीयांचा आवाज नंतरचा काही काळ बंद झाला होता. धोनीनं रिटायरमेंटचा जो 4.2 मिनिटांचा अधिकृत व्हिडिओ प्रसिद्ध केलाय त्यात जवळपास 20  सेकंद त्याचे हे शेवटचे रन आऊट दाखवलंय. मैदानावरचे यश आणि अपयश शांतपणे स्विकारणाऱ्या आणि ते मैदानावर सोडून पुढच्या क्षणी सामान्य आयुष्य जगणे ही ज्या धोनीची सवय आहे, त्या धोनीलाही 'ती आठवण' किती छळतीय  हे आपल्याला समजण्यासाठी धोनीनं त्या रन आऊटच्या प्रसंगाला दिलेला इतका वेळ पुरेसा आहे.

धोनी वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर एकही सेमी फायनल खेळला नाही. 'तो रिटायर कधी होणार?' 'तो रिटायर का होत नाही?' 'तो जागा अडवून का बसलाय?' ' त्याने इतरांना जो नियम लावला त्याची स्वत: का अंंमलबजावणी करत नाही?' यासारखे अनेक प्रश्न अनेकांनी विचारले. धोनी त्याच्या स्वभवाप्रमाणे शांत होता. त्याच्यात आणि निवड समितीत काय चर्चा झाली का? याचे अंदाज अनेकांनी बांधले. ठराविक दिवसांनी त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु होत असे. अखेर तो त्याने ठरवले त्याच दिवशी, त्याच्या नेहमीच्या शांत पद्धतीने निवृत्त झाला. 

त्याचे लग्न, टेस्टमधील निवृत्ती, वन-डे आणि टी-२० कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय याच प्रमाणे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती यापैकी कोणतीही बातमी जगात कुणालाही 'ब्रेक' करता आली नाही. आता त्याच्या निवृत्तीनंतर पुन्हा एकदा सर्वांनी त्याच्या 'टायमिंगवर' 'वेळकाढू' चर्चा सुरु केलीय. 'हत्ती आणि सात आंधळे' या गोष्टीप्रमाणे अनेकजण त्यावर काथ्याकूट करतायत. धोनीचा स्वभाव पाहता या सर्वांना त्याच्याकडून उत्तर मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काळातही अनेक जण 'आपल्यातल्या शेरलॉकला अनलॉक करत' नवे-नवे सिद्धांत मांडत स्वत:ची पाठ थोपटून घेतील हे नक्की.

सौरव गांगुलीनं नव्या भारतीय टीमची उभारणी केली. टीम इंडियाला आक्रमक बनवलं. धोनीनं या आक्रमकतेला शांततेची जोड दिली. 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2008 साली सीबी सीरिज जिंकल्यानंतर अगदी सामान्य विजयासारखे राहा, अवास्तव सेलिब्रेशन करु नका' अशी स्पष्ट सूचना धोनीनं टीममधल्या सर्व सहकाऱ्यांना दिली होती. 'ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणे ही जगासाठी मोठी गोष्ट असेल. आमच्यासाठी ही एक सामान्य बाब आहे'. हा संदेश ऑस्ट्रेलियासह संपूर्ण क्रिकेट विश्वाला टीम इंडियानं दिला होता. 

यश आणि अपयश हे खेळाचा आणि आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. यशानंतर अपयश आणि अपयशानंतर पुन्हा यश ही सर्व प्रोसेस सतत सुरु राहणार आहे. आपण या प्रोसेसचा अभ्यास करायचा. आपले स्कील अधिक घोटीव करायचे आणि त्यानंतर जे काही होईल त्याला शांतपणे समोर जायचे. या विस्तीर्ण ब्रह्मांडातला आपण एक बिंदू आहोत, आपल्यापूर्वी इथे अनेक सरस होऊन गेले आणि पुढेही अनेक अव्वल होतील. आपण फक्त काल आणि उद्या या साखळीला जोडणारा आज आहोत. हा आज आपल्याला अधिक समृद्ध करायचा आहे. धोनीचं करियर हीच शिकवण देते.

महेंद्र सिंग धोनीनं निवृत्तीसाठी देखील याच प्रकारचे गाणे निवडले आहे. करियरमधील सर्वोच्च क्षण आणि अगदी तळाचे क्षण याला या व्हिडिओमध्ये समान महत्व देण्यात आलंय. धोनीचा तो व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आले. त्यानंतर पुन्हा प्रत्येकदा व्हिडिओ पाहतानाही डोळ्यातलं पाणी थांबलं नाही. त्यामधील प्रत्येक प्रसंग हा माझ्यासह अनेकांच्या तारुण्याची गोष्ट आहे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हे पाहताना त्या सर्व आठवणीने डोळ्यात पाणी येणार आहे.

धोनीला निवृत्तीच्या प्रसंगी जगाला काय सांगायचे आहे ते त्याने साहिर लुधियानवी यांच्या शब्दात सांगितले. माझ्यासाठी धोनी काय आहे हे सांगण्यासाठी देखील मला साहिरचेच शब्द आठवतात....

रिश्तों का रूप बदलता है, बुनियादे खतम नही होती

ख्वाबो और उमंगों की मियादें खतम नही होती

- ''मैं हर इक पल का शायर हूँ''

 


LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...